Sunday 30 January 2011

127 अवर्स (२०११)

दिग्दर्शक - डॅनी बॉयल

१२७ अवर्स चित्रपटाबद्दल बरंच ऐकलेलं होतं, त्याच्या ऑस्कर शर्यतीतल्या प्रवेशामुळे, रेहमानच्या संगीताच्या ग्लोबल रिकग्निशनमुळे, डॅनी बॉयल दिग्दर्शित असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे सत्यघटनेवर आधारीत असल्यामुळे सिनेमा पाहायचा हे निश्चितच होतं. त्यात रोहनने त्यावर शिक्कामोर्तब केलं.


ऍरॉन रालस्टन या गिर्यारोहकाच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण, जीवघेण्या पण धाडसी १२७ तासांची ही कहाणी सांगतो.  ऍरॉन रालस्टनचं बेस्टसेलर पुस्तक 'बिटवीन अ रॉक ऍण्ड अ हार्ड प्लेस' ह्यात ही संपुर्ण धाडसकथा लिहिली आहे.

ऍरॉन हा गिर्यारोहक, आपला जवळपास प्रत्येक विकांत हा गिर्यारोहण आणि भटकंतीत घालवत असतो, त्याचा फिरण्यासाठी लाडका भाग म्हणजे 'ब्ल्यु जॉन कॅनियन'.  असंख्य वेळा तिथे गेल्यामुळे त्या भागाची सविस्तर माहिती असलेला.  एका विकांताला असाच तो तिकडे निघतो, वाटेत दोन रस्ता चूकलेल्या मुलींना अत्यंत सुंदर अशी जागा जिथे दगडातून एकदम पाण्याच्या साठ्यात उडी घेता येतं दाखवतो, त्यांना सोडून परत आपल्या कॅनियनच्या हायकिंगवर निघतो.  त्या कॅनियनच्या चिंचोळ्या दर्‍यातून जाताना त्याला अपघात होतो, आणि एक भला मोठा दगड त्याच्या उजव्या हाताला घेऊन दरीत अडकून बसतो.  सुरुवातीला ऍरॉनला त्या प्रसंगाचं गांभिर्य लक्षात येत नाही, आपल्याकडील वस्तू वापरून तो यातनं सुटेल असे प्रयत्न करतो पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की त्याच्याजवळ जास्त पर्याय नाहीत.  ऍरॉनच्या अतिआत्मविश्वासामुळे तो मोहिमेवर निघताना मोबाईल फोन घेत नाही, आईचा फोन घेत नाही का तर तिने जाऊ दिलं नसतं, घाईत चांगला चाकू (स्वीस नाईफ सेट) घेत नाही.  कुणालाही कुठे जाणार हे सांगत नाही, त्यामुळे त्याची सुटका अजुनच अवघड बनते.  त्यात पाणी आणि अन्नही अपुरं असतं. त्यातून तो कशी सुटका करतो हा सिनेमाचा पुढचा प्रवास.
जालावरून साभार

सिनेमाचा  सुरुवातीचा भाग अतिशय प्रेक्षणीय आहे, कॅनियनला अतिशय सुंदररित्या चित्रीत केलं आहे, आणि दगडांच्या चिंचोळ्या दरीतून पाण्यात उडी घेण्याचा थरारक प्रसंग अतिशय पाहणेबल आहे. त्यानंतर मात्र ऍरऑन अडकल्यावर केवळ घळीत संपुर्ण सिनेमा आहे आणि पठकथेवर डॅनी बॉयलने सुंदर  सिनेमा घडवला आहे. घरुन घाईत निघताना पाणी भरताना तो ते सांडू देतो, नंतर नळ नीट बंद करत नाही, तोच ऍरॉन  नंतर मात्र पाण्यासाठी कसा तडफडतो, शेवटी सुटका झाल्यावर अगदी घाण पाणी सुद्धा पितो. आधी वैतागलेला ऍरॉन नंतर मात्र सुटकेचे एक एक प्रयत्न करतो, प्रयत्न असफल ठरू लागल्यावर आपल्या आयुष्यातला चूका, स्वकियांबद्दलच्या त्याच्या आठवणी, आईचा फोन न उचलल्याबद्दल वाईट वाटणं, एकटं बर्‍याच वेळ राहील्यावर अगदी उडणार्‍या पक्ष्याला बोलावसं वाटणं असे अनेक प्रसंग आपल्याला हेलावून सोडतात.

सिनेमाचं खरं यश म्हणजे ऍरॉन बरोबर आपण त्या सिच्युएशनमध्ये मिसळून जातो, अगदी अडकल्यावर त्याची घुसमट स्वतः अनुभवतो.  प्रमुख भुमिकेत जेम्स फ्रॅन्कोने अतिशय उत्तम काम केलं आहे.  नक्की पहावा.

Saturday 29 January 2011

दिल तो बच्चा है जी (२०११)

दिग्दर्शक - मधुर भांडारकर

वास्तववादी आणि सिरियस सिनेमा बनविणारा दिग्दर्शक ही प्रतिमा पुसण्यासाठी बहुदा मधुरने ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न 'दिल तो बच्चा है जी' सिनेमाद्वारे केला, बॉलीवूडपटांचा लाडका विषय 'प्रेम' घेऊन पण थोडासा वेगळा.. थोडा वास्तवदर्शी.  तरीही हा सिनेमा बिनसलेलाच आहे.

एक घटस्फोटीत चाळीशीचा आसपासचा (अजय देवगण), एक भोळा सरळमार्गी प्रेमावर गाढ विश्वास असणारा (ओमी वैद्य), तिसरा फ्लर्ट चालू टाईप (इम्रान हाशमी) , असे तीन वेगवेगळ्या लोकांच्या प्रेमाची ही कहाणी.  अजय देवगणचं त्याच्याच ऑफिसमधील नव्या इंटर्नवर प्रेम बसतं, ती त्याच्यापेक्षा वयाने तब्बल १७ वर्षाने लहान असते, ओमी वैद्यसारखा सरळमार्गी गृहीणी टाईप मुलगी स्वप्ननार्‍याला मुलगी आवडते ती RJ असते आणि अभिनेत्री व्हायचं स्वप्न बाळगून असते, तिच्या ठायी करीयर जास्त महत्वाचं.  प्लेबॉय इम्रान जिच्या प्रेमात पडतो तिच्या सावत्र आईसोबत त्याचं अफेअर असतं. अश्या अडचणी असणार्‍या प्रेमकथांचा पुढचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.

सिनेमाचा पिंड हलका फुलका ठेवायचा प्रयत्न आहे, पण विनोदी जागा अतिशय कमी आहेत, खळखळून हसण्याचे तर अतिशय कमी प्रसंग आहेत, बर्‍याच विनोदांना प्रेक्षक हसतही नाहीत.  आणि सर्व विनोद हे अश्लील आहेत (सिनेमाला A सर्टीफिकेट आहे).  थोडक्यात मधुरसाठी विनोदी सिनेमा हे प्रकरण बसलं नाही.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही नायिकेने अभिनयाचा प्रयत्नही केला नाही (अपवाद टिस्का चोप्रा) असं जाणवतं.  अजय देवगण काही सिन्स मध्ये उत्तम तर बाकी अवघडलेला वाटला.  ओमी वैद्य अजुनही थ्री इडिट्सच्या चतूर रामलिंगमच्या बाहेर आला नाही, त्यानं अजिबात व्हरायटी केली नाहीये, त्याला मराठी तेही पुण्याचं दाखवलंय आणि तो स्वतःच आडनाव 'केळकर' ऐवजी 'केलकर' असं हिंदी स्टाईल मध्ये म्हणतो, बाकी नॉन महाराष्ट्रीयन कॅरेक्टर्स असं म्हणतात ते समजू शकतं... तसंही अधुन मधुन त्याचं मराठीही तसं काही मराठीपण दर्शवत नाही.  इम्रान हाश्मीसाठी ही टेलरमेड भुमिका आहे, त्याला जास्त काही वेगळं करावं लागलं नाही, पण तिघातही सर्वात भाव तोच खाऊन जातो, आणि इमोशनल चेहराही त्याने बर्‍यापैकी दाखवला आहे.  'जन्नत' पासून त्याच्या दगडी चेहर्‍यात बरेच चांगले बदल झाले आहेत. :)

मधुर भांडारकर थोड्या सिन्समधुन चमक दाखवतो पण बाकी सिनेमा अतिशय सपाट वाटतो, तिनही पात्रांचे एकसारखे प्रसंग (उदा. प्रेम सफल होण्यासारखं वाटणे, नंतर तो भ्रम ठरणे) हे एकामागोमाग आहेत त्यामुळे पहिल्या पात्राचं जे काही झालं तेच दुसर्‍यांच होणार हे निश्चित असल्यामुळे बराच इंट्रेस्ट कमी होतो, हे दिग्दर्शकाचं अपयश झालंय.  थोडक्यात निराशाजनक अनुभव.