Showing posts with label ओमी वैद्य. Show all posts
Showing posts with label ओमी वैद्य. Show all posts

Saturday, 29 January 2011

दिल तो बच्चा है जी (२०११)

दिग्दर्शक - मधुर भांडारकर

वास्तववादी आणि सिरियस सिनेमा बनविणारा दिग्दर्शक ही प्रतिमा पुसण्यासाठी बहुदा मधुरने ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न 'दिल तो बच्चा है जी' सिनेमाद्वारे केला, बॉलीवूडपटांचा लाडका विषय 'प्रेम' घेऊन पण थोडासा वेगळा.. थोडा वास्तवदर्शी.  तरीही हा सिनेमा बिनसलेलाच आहे.

एक घटस्फोटीत चाळीशीचा आसपासचा (अजय देवगण), एक भोळा सरळमार्गी प्रेमावर गाढ विश्वास असणारा (ओमी वैद्य), तिसरा फ्लर्ट चालू टाईप (इम्रान हाशमी) , असे तीन वेगवेगळ्या लोकांच्या प्रेमाची ही कहाणी.  अजय देवगणचं त्याच्याच ऑफिसमधील नव्या इंटर्नवर प्रेम बसतं, ती त्याच्यापेक्षा वयाने तब्बल १७ वर्षाने लहान असते, ओमी वैद्यसारखा सरळमार्गी गृहीणी टाईप मुलगी स्वप्ननार्‍याला मुलगी आवडते ती RJ असते आणि अभिनेत्री व्हायचं स्वप्न बाळगून असते, तिच्या ठायी करीयर जास्त महत्वाचं.  प्लेबॉय इम्रान जिच्या प्रेमात पडतो तिच्या सावत्र आईसोबत त्याचं अफेअर असतं. अश्या अडचणी असणार्‍या प्रेमकथांचा पुढचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.

सिनेमाचा पिंड हलका फुलका ठेवायचा प्रयत्न आहे, पण विनोदी जागा अतिशय कमी आहेत, खळखळून हसण्याचे तर अतिशय कमी प्रसंग आहेत, बर्‍याच विनोदांना प्रेक्षक हसतही नाहीत.  आणि सर्व विनोद हे अश्लील आहेत (सिनेमाला A सर्टीफिकेट आहे).  थोडक्यात मधुरसाठी विनोदी सिनेमा हे प्रकरण बसलं नाही.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही नायिकेने अभिनयाचा प्रयत्नही केला नाही (अपवाद टिस्का चोप्रा) असं जाणवतं.  अजय देवगण काही सिन्स मध्ये उत्तम तर बाकी अवघडलेला वाटला.  ओमी वैद्य अजुनही थ्री इडिट्सच्या चतूर रामलिंगमच्या बाहेर आला नाही, त्यानं अजिबात व्हरायटी केली नाहीये, त्याला मराठी तेही पुण्याचं दाखवलंय आणि तो स्वतःच आडनाव 'केळकर' ऐवजी 'केलकर' असं हिंदी स्टाईल मध्ये म्हणतो, बाकी नॉन महाराष्ट्रीयन कॅरेक्टर्स असं म्हणतात ते समजू शकतं... तसंही अधुन मधुन त्याचं मराठीही तसं काही मराठीपण दर्शवत नाही.  इम्रान हाश्मीसाठी ही टेलरमेड भुमिका आहे, त्याला जास्त काही वेगळं करावं लागलं नाही, पण तिघातही सर्वात भाव तोच खाऊन जातो, आणि इमोशनल चेहराही त्याने बर्‍यापैकी दाखवला आहे.  'जन्नत' पासून त्याच्या दगडी चेहर्‍यात बरेच चांगले बदल झाले आहेत. :)

मधुर भांडारकर थोड्या सिन्समधुन चमक दाखवतो पण बाकी सिनेमा अतिशय सपाट वाटतो, तिनही पात्रांचे एकसारखे प्रसंग (उदा. प्रेम सफल होण्यासारखं वाटणे, नंतर तो भ्रम ठरणे) हे एकामागोमाग आहेत त्यामुळे पहिल्या पात्राचं जे काही झालं तेच दुसर्‍यांच होणार हे निश्चित असल्यामुळे बराच इंट्रेस्ट कमी होतो, हे दिग्दर्शकाचं अपयश झालंय.  थोडक्यात निराशाजनक अनुभव.