Tuesday 13 April 2010

स्वदेस, वुई द पिपल (२००४)

दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर

अरविंद पिल्ललमरी आणि रवी कुचिमंची या एनआरआय जोडगोळींच्या कार्यावर आधारीत २००४ सालचा आशुतोष गोवारीकरांचा ’स्वदेस’ माझ्या आवडत्या हिंदी चित्रपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे.  देशाबद्दलची थीम असुनदेखील बेगडी देशप्रेमाला दिलेला फाटा, आणि भारताच्या सद्यस्थितीचे उत्तम केलेले अवलोकन याच्या जमेच्या बाजु.  भारताने प्रगती जरी केलेली असेल तरी अजुनही ७०% ग्रामीण भारत अजुनही मागासलेला आहे.  शिक्षणसमस्या, वीजटंचाई, दारिद्र्य, बाल विवाह आणि सर्वात महत्वाची जाती व्यवस्था या सर्व समस्या, माणसांचे स्वभाव विशेष यासर्वांना हा चित्रपट स्पर्शतो.

कथा म्हणजे, अमेरीकेत नासा शास्त्रज्ञ असलेला मोहन भार्गव (शाहरुख खान) आपल्या लहानपणी सांभाळ केलेल्या कावेरीअम्मांना अमेरीकेत घेवुन जाण्यासाठी येतो, आणि भारतातिल खेड्यातल्या अनेक समस्यांसोबत त्याची ओळख होते.  अमेरीकेत राहील्यामुळे त्या बद्दल त्याला वाटणारे आश्चर्य, गावातील लोकांचे दुर्लक्ष, अनेकविध स्वभावाचे नमुने, प्रसंगी आलेली निराशा आणि काढलेला मार्ग यातुन सिनेमाची घडण होते.

सिनेमाचे एक-एक सिन्स वर्णन करण्याजोगे आहेत, सगळ्यात भावलेला प्रसंग म्हणजे, शेतकर्‍याच्या गावाहुन परत येणार्‍या मोहनची रेल्वे एका स्टेशनवर थांबते, त्या उन्हाच्या वेळी एक ८-९ वर्षाचे पोर २५ पैश्याला पाणी विकत असते, नेहमी बाटलीबंद (मिनरल वॉटर) पाणी पिणारा मोहन डबडबलेल्य डोळ्यांनी ते पाणी पितो. हा पाहण्यासारखा सिन आहे.  हरीदास या शेतकर्‍याची दैना ऐकुन अतिशय दु:खी झालेला मोहन शाहरुखने केवळ चेहर्‍याने दाखवलाय, एकही शब्द न बोलता.

केवळ व्यवसाय बदलला म्हणुन एका कुटुंबाला देशोधडीला लावण्यात येते,  घरात मुलांच्या अंगावर वितभर कपडे नसताना देखिल अतिथी देवो भव: म्हणुन पाहुण्यांना अन्न देणे तो गरीब कर्तव्य समजतो,  तर सरासर अन्याय असणार्‍या गोष्टींना समाज रीत समजतो.




दसर्‍याच्या दिवशी शाळेतल्या कार्यक्रमा दरम्यान अमेरिका कशी आहे याबद्दल गावकर्‍यांसोबत मोहनची चर्चा ’मेरा भारत महान’ वाल्यांनी ऐकायलाच हवी.  त्यातले मोहनचे ’जब भी हम मुकाबले में कम पडते है तो हम संस्कृती, परंपरा का आधार लेते है’ हे खासच.  मोहन निर्भयपणे म्हणतो ’मुझे नही लगता हमारा देश दुनियाका सबसे महान देश है, लेकीन ये जरुर मानता हुं के हममें वो काबिलियत है, अपने देश को महान बनाने की’...  बेगडी देशप्रेमापेक्षा हे झणझणीत अंजन खरंच उपयोगाचं आहे.

एकीकडे भारतातले सुशिक्षीत अमेरीकेत जाउन नासा सारख्या संस्थेमध्ये काम करत असताना गावात साधी वीज नसावी?  इंटरनेट, इमेल्स त्यांना परग्रहावरचे शब्द वाटावेत?
ब्राम्हण असणे म्हणजे केवळ पुजापाठ करावी?  खालच्या(?) जातींच्या लोकांना माणुस म्हणुन वागणुक नाही? ’संस्कृती’ बद्दल इतका अभिमान तरी वृद्धाश्रम भरलेले कसे?  मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता.. एक-न-एक अनेक समस्या आपल्याला अस्वस्थ करुन सोडतात.  या गोष्टी मोहन या अमेरिकेत राहणार्‍या माणसाला कळतात पण इथलेच लोक त्याबद्दल अतिव कोरडे असतात.

शास्त्रज्ञ असल्यामुळे शेवटचा वीज निर्मीतीचा प्रसंग केवळ हिरो असल्यामुळे सक्सेस झाल्याची भावना नाही येत. हे अजुन एक चित्रपटाचे यश.  एकदम शेवटची फिल्मी झालर सोडता संपुर्ण चित्रपट मला खुप भावतो.

३ तासांच्या या सिनेमात आशुतोष गोवारिकरने कमाल केली आहे, सिनेमा थोडाही कंटाळवाना होत नाही.  आशुतोषची प्रत्येक गोष्ट तपशिलवार दाखविण्याची सवय आहे, गावच्या इतिहासापासुन प्रत्येक समस्येच्या मुळाशी तपशिलवारपणे तो जातो.  शाहरुख नासाचा शास्त्रज्ञ असल्यमुळे खर्‍या नासामध्ये शुटींग केलेली आहे, आणि नासाच्या खर्‍याखुर्‍या प्रोजेक्टचे नाव सिनेमात वापरले आहे. शाहरुख खानच्या संयत अभिनयामागे आशुतोषचा खंबीर हात आहे. मी पाहीलेली शाहरुखची ही सर्वात उत्तम अदाकारी. गायत्री जोशी वगळता बाकी सर्वांचा अभिनय उत्तम झाला आहे. 

गाणी सगळी श्रवणीय असली तरी सावरियां हे कापायला हवं होतं.  पार्श्वसंगीत अगदी साजेसं आहे,  चित्रपटाच्या मुड नुसार मन काळवंडुन टाकतं आणि हलक्या सिन्सला फुलवतं. 

केवळ राजकारणी आणि इतरांना दोष देत बसुन न राहता केल्याने होत आहे चा संदेश देणारा हा सिनेमा संग्रही असावा असाच आहे.

21 comments:

  1. माझा चित्रपट आवडी-निवडी बाबत प्रचंड प्रॉब्लेम आहे असं मला बर्‍याच वेळा वाटतं. तू म्हणालास ते बरेच मुद्दे मला पटले पण तरीही समहाऊ मला हा चित्रपट आवडला नाही. संवाद खुपच विक वाटले. कुठलाच प्रसंग ठसठशीतपणे मांडला गेलाय असं मला वाटलं नाही. हे सगळं असंच मी जेव्हा माझ्या मित्रांशी बोलताना म्हणतो तेव्हा सगळेजण मला वेड्यात काढतात. :-) असो..
    अर्थात पण परीक्षण तू नेहमीप्रमाणेच सुंदर लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  2. हेरंब, या चित्रपटासोबत सर्वांचीच नाळ नाही जुळली. चित्रपट डॉक्युमेंट्री वाटण्याची दाट शक्यता आहे. ३ तासांपेक्षा जास्त कालावधी आणि अधिक टप्पे आणि वळणं नसनार्‍या सपाट पटकथेमुळे कदाचित बोअर होऊ शकतो. मनोरंजानाच्या दृष्टीने यात जास्त काही मिळत नाही हे कदाचित खरंय. पण वास्तवपटाच्या माझ्या जवळपास सर्व अपेक्षा पुर्ण करतो हा चित्रपट.

    ReplyDelete
  3. माझ्या पण आवडीच्या चित्रपटा पैकी एक. शाहरुखचा संयमीत अभिनय ही एक जमेची बाजु अर्थात हे श्रेष गोवारीकरच.

    चरणपुर पण मस्त उभा केलय.अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे गावाचा फिल येतो. उदा. M80 चा वापर(तेही टिबल सिट),पडद्यावरचा सिनेमा,तालीम,आणि कौलारु घरे.

    आणि कावेरी अम्मा च तर काम मस्तच मला माझ्या आज्जी ची आठवण येते कावेरी अम्माला पाहिली की.

    चित्रपटातील गाणी पण कथा पुढे घेऊन जातात.

    बाकी रेहमान आणि अख्तर बद्दल काही वेगळ लिहायला नको.
    अप्रतिम

    -
    सचिन उथळे-पाटील

    ReplyDelete
  4. सचिन, ब्लॉगवर स्वागत. अजुन बरंच काही लिहायसारखं आणि पाहण्यासारखं आहे या चित्रपटात.

    ReplyDelete
  5. चित्रपटाची लांबी हा चित्रपटाला मारक ठरलेला घटक. चित्रपटातील हिरो नासा सोडून विज नसलेल्या खेड्यात रहाण्याचा निर्धार करतो, तसे वेडे भारतात आहेत फक्त त्यांची प्रसिद्धी होत नाही. आपल्याकडे उगवत्या सूर्याला दंडवत करण्याचा रिवाज आहे. गावात विज आणण्याच्या प्रकियेचे प्रसंग जास्त लांबवले गेले आहेत.. बेगडी परंपरा आणि संस्कृतींवर आसूड ओढणारा प्रसंग अधिक परिणामकारक असायला हवा होता. चित्रपटात प्रेमगीतं नसती तरी चाललं असतं. एक भारतीय म्हणून हा चित्रपट पाहिला, तर आपण कुठे चुकत आहोत याची जाणीव होते. चित्रपट आवडला.

    ReplyDelete
  6. कांचन, प्रत्येक प्रसंग तपशिलवार दाखवायचा ही गोवारिकरांची खासियत, त्यामुळे चित्रपटाची लांबी जास्त झाली आहे, खरंय प्रेमगीते वजा केली असती तर परिणाम थोडा जास्त झाला असता. पण महत्वाच्या विषयावर अत्यंत जवाबदारी आणि गांभिर्याने सांगितले गेलेले प्रसंग याला वेगळ्या उंचीवर ठेवतात.

    ReplyDelete
  7. सावरिया खटकतं...एकदम सेम...आणि सिनेमा तुफान आवडतो मला...८-१० वेळा बघितला असेल मी...आणि मी कट्टर शाहरुख द्वेष्टा आहे....आणि हो मला मनोरंजन दृष्ट्याही आवडतो...

    ReplyDelete
  8. विद्याधर, ब्लॉगवर स्वागत. मनोरंजन दृष्ट्या मला आवडतो, पण बर्‍याच जणांना डॉक्युमेंट्री टाईप वाटतो. मी शाहरुख द्वेष्टा नाही, बरं या द्वेषा मागे कारण तरी काय ?

    ReplyDelete
  9. अरे द्वेष मी आत्ता ह्या माय नेम नंतर करायला लागलो...त्याआधी मला तो ठीकठाक वाटायचं..एका जमान्यात तर तो मला आदर्श माणूस वाटायचा...अरे जो माणूस फक्त पैश्याचं गणित ठेऊन खुनी शत्रूला मित्र म्हणू शकतो त्या माणसाचा द्वेष नाही करायचा तर काय !

    ReplyDelete
  10. हम्म, सहमत. तुझ्या मतांचा आदर आहे. असो प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  11. आनंद मला माफ करा पण एकच सांगेन कि,अभिनय हा दिग्दर्शक लिहितो किंबहुना तो करून देखील दाखवतो मात्र ते पूर्ण करण्याचे काम अभिनेत्याचे असते.केवळ दिग्दर्शक चांगला असून भागात नाही. किंबहुना काही वेळा दिग्दर्शनातल्या त्रूटी देखील अभिनयामुळे झाकल्या जातात.ह्याचेच चांगले उदाहरण म्हणजे 'माय नेम इज खान',आपण बघितला असेन तर आपल्या लक्षात येईल कि करण जोहरच्या फुटक्या दिग्दर्शनाला शाहरुखने किती कवर केले आहे.
    त्यामुळे गोवारीकरांचा शाहरुखच्या अभिनायामागे हात आहे असं आपण म्हणूच शकत नाही.कारण काहीही असलं तरीही तो अप्रतिम अभिनेता आहे.त्याला फुकट 'किंग' म्हणत नाहीत.
    बाकी शेवटी तो गोवारीकर आहे त्याच्या शोर्ट फिल्म असो किंवा चित्रपट तो कहर करणारच.

    ReplyDelete
  12. अनिकेत, शाहरुखहा चांगला अभिनेता आहे, मी असे नाही म्हटले की तो वाईट अभिनेता आहे. माझं वाक्य होतं, शाहरुखच्या "संयत" अभिनयामागे गोवारिकरांचा खंबीर हात आहे. "संयत" अश्यासाठी की ही नेहमीची रोमॅंटीक भुमिका नव्हती आणि शाहरुखच्या नेहमीच्या एनर्जेटीक अभिनयाऐवजी त्याला थोडी त्याच्या ईमेजविरुद्ध संयमीत अभिनय करावा लागला. प्रतिक्रियेकरीता धन्यवाद...

    ReplyDelete
  13. आनंद, माझ्या अतिशय आवडत्या सिनेमांपैकी हा एक. अनेकवेळा पाहिलाय आणि अजूनही पाहीनच. :) आशुतोषने शाहरूखला अजिबात भुमिकेपासून ढळू दिलेले नाही. स्वत: शाहरुखनेही म्हटले आहेच की माझ्या कारकिर्दीतील हा अप्रतिम चित्रपट. जिथे मी स्टार नसून अभिनेता होतो आणि याचे संपूर्ण श्रेय आशुचेच आहे.
    परिक्षण नेहमीप्रमाणे उत्तमच.

    ReplyDelete
  14. भागश्रीताई, कुठे होती तू, जालावर नाही दिसली? खरंय, हा सिनेमा परत परत पाहण्यासारखा आहे, संग्रही ठेवावा असा.

    ReplyDelete
  15. स्वदेसच्या शाहरुखसाठी तू ’संयत’ शब्द वापरलास तो अगदी बरोबर आहे.
    त्याचा बर्‍याच चित्रपटांमधे जाणवणारा भडकपणा इथे नाही जाणवत..
    स्वदेस पाहून भारतात परत आलेल्या लोकांची बातमी सकाळमधे आली होती.. :)

    ReplyDelete
  16. धन्यु मीनल. स्वदेस, चक-दे-इंडिया आणि कभी हां कभी ना यामधील त्याचा अभिनय खुप वेगळा आहे.

    ReplyDelete
  17. आनंद.... घरी जरा गडबड...विरोप धाडतेय तुला... :)

    ReplyDelete
  18. लांबीमुळे थोडासा कंटाळवाणा झालेला असला तरीही खरच पाहाण्यासारखाच आहे हा सिनेमा..लहान लहान गोष्टीही छान सादर केल्या आहेत गोवारीकरांनी..शिवाय हयात शाहरुखही नेहमीच्या ’हिरोगीरी’ तुन बाहेर आला आहे..बाकी तुम्ही अगदि योग्य शब्दात परीक्षण केल आहे चित्रपटाच...

    ReplyDelete
  19. देवेंद्र, ब्लॉगवर स्वागत. आवर्जुन प्रतिक्रियेकरीता धन्यवाद.
    मला एकेरी हाक चालेल.

    ReplyDelete
  20. This movie i watched in Korea and after that i realised the what is the condition of India in rural area. i think i saw this movie around 75-80 times.

    Specially i like the theme of Swades movie when Shahrukh is travelling from US to India . This is my one of the favourite instrumental.

    I think every youngster of India should watch this movie and take oath to do something about India.
    Thanks to Ashutosh Gowarikar


    Sorry for the comments in English because in my office Google IME is not working but i liked this comment about Swades so i am writing my opinion in English.

    ReplyDelete
  21. ब्लॉगवर स्वागत निखील. तुझ्या मतांशी पुर्णपणे सहमत.
    प्रतिक्रियेकरीता आभार.

    ReplyDelete