Showing posts with label २००४. Show all posts
Showing posts with label २००४. Show all posts

Tuesday, 13 April 2010

स्वदेस, वुई द पिपल (२००४)

दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर

अरविंद पिल्ललमरी आणि रवी कुचिमंची या एनआरआय जोडगोळींच्या कार्यावर आधारीत २००४ सालचा आशुतोष गोवारीकरांचा ’स्वदेस’ माझ्या आवडत्या हिंदी चित्रपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे.  देशाबद्दलची थीम असुनदेखील बेगडी देशप्रेमाला दिलेला फाटा, आणि भारताच्या सद्यस्थितीचे उत्तम केलेले अवलोकन याच्या जमेच्या बाजु.  भारताने प्रगती जरी केलेली असेल तरी अजुनही ७०% ग्रामीण भारत अजुनही मागासलेला आहे.  शिक्षणसमस्या, वीजटंचाई, दारिद्र्य, बाल विवाह आणि सर्वात महत्वाची जाती व्यवस्था या सर्व समस्या, माणसांचे स्वभाव विशेष यासर्वांना हा चित्रपट स्पर्शतो.

कथा म्हणजे, अमेरीकेत नासा शास्त्रज्ञ असलेला मोहन भार्गव (शाहरुख खान) आपल्या लहानपणी सांभाळ केलेल्या कावेरीअम्मांना अमेरीकेत घेवुन जाण्यासाठी येतो, आणि भारतातिल खेड्यातल्या अनेक समस्यांसोबत त्याची ओळख होते.  अमेरीकेत राहील्यामुळे त्या बद्दल त्याला वाटणारे आश्चर्य, गावातील लोकांचे दुर्लक्ष, अनेकविध स्वभावाचे नमुने, प्रसंगी आलेली निराशा आणि काढलेला मार्ग यातुन सिनेमाची घडण होते.

सिनेमाचे एक-एक सिन्स वर्णन करण्याजोगे आहेत, सगळ्यात भावलेला प्रसंग म्हणजे, शेतकर्‍याच्या गावाहुन परत येणार्‍या मोहनची रेल्वे एका स्टेशनवर थांबते, त्या उन्हाच्या वेळी एक ८-९ वर्षाचे पोर २५ पैश्याला पाणी विकत असते, नेहमी बाटलीबंद (मिनरल वॉटर) पाणी पिणारा मोहन डबडबलेल्य डोळ्यांनी ते पाणी पितो. हा पाहण्यासारखा सिन आहे.  हरीदास या शेतकर्‍याची दैना ऐकुन अतिशय दु:खी झालेला मोहन शाहरुखने केवळ चेहर्‍याने दाखवलाय, एकही शब्द न बोलता.

केवळ व्यवसाय बदलला म्हणुन एका कुटुंबाला देशोधडीला लावण्यात येते,  घरात मुलांच्या अंगावर वितभर कपडे नसताना देखिल अतिथी देवो भव: म्हणुन पाहुण्यांना अन्न देणे तो गरीब कर्तव्य समजतो,  तर सरासर अन्याय असणार्‍या गोष्टींना समाज रीत समजतो.




दसर्‍याच्या दिवशी शाळेतल्या कार्यक्रमा दरम्यान अमेरिका कशी आहे याबद्दल गावकर्‍यांसोबत मोहनची चर्चा ’मेरा भारत महान’ वाल्यांनी ऐकायलाच हवी.  त्यातले मोहनचे ’जब भी हम मुकाबले में कम पडते है तो हम संस्कृती, परंपरा का आधार लेते है’ हे खासच.  मोहन निर्भयपणे म्हणतो ’मुझे नही लगता हमारा देश दुनियाका सबसे महान देश है, लेकीन ये जरुर मानता हुं के हममें वो काबिलियत है, अपने देश को महान बनाने की’...  बेगडी देशप्रेमापेक्षा हे झणझणीत अंजन खरंच उपयोगाचं आहे.

एकीकडे भारतातले सुशिक्षीत अमेरीकेत जाउन नासा सारख्या संस्थेमध्ये काम करत असताना गावात साधी वीज नसावी?  इंटरनेट, इमेल्स त्यांना परग्रहावरचे शब्द वाटावेत?
ब्राम्हण असणे म्हणजे केवळ पुजापाठ करावी?  खालच्या(?) जातींच्या लोकांना माणुस म्हणुन वागणुक नाही? ’संस्कृती’ बद्दल इतका अभिमान तरी वृद्धाश्रम भरलेले कसे?  मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता.. एक-न-एक अनेक समस्या आपल्याला अस्वस्थ करुन सोडतात.  या गोष्टी मोहन या अमेरिकेत राहणार्‍या माणसाला कळतात पण इथलेच लोक त्याबद्दल अतिव कोरडे असतात.

शास्त्रज्ञ असल्यामुळे शेवटचा वीज निर्मीतीचा प्रसंग केवळ हिरो असल्यामुळे सक्सेस झाल्याची भावना नाही येत. हे अजुन एक चित्रपटाचे यश.  एकदम शेवटची फिल्मी झालर सोडता संपुर्ण चित्रपट मला खुप भावतो.

३ तासांच्या या सिनेमात आशुतोष गोवारिकरने कमाल केली आहे, सिनेमा थोडाही कंटाळवाना होत नाही.  आशुतोषची प्रत्येक गोष्ट तपशिलवार दाखविण्याची सवय आहे, गावच्या इतिहासापासुन प्रत्येक समस्येच्या मुळाशी तपशिलवारपणे तो जातो.  शाहरुख नासाचा शास्त्रज्ञ असल्यमुळे खर्‍या नासामध्ये शुटींग केलेली आहे, आणि नासाच्या खर्‍याखुर्‍या प्रोजेक्टचे नाव सिनेमात वापरले आहे. शाहरुख खानच्या संयत अभिनयामागे आशुतोषचा खंबीर हात आहे. मी पाहीलेली शाहरुखची ही सर्वात उत्तम अदाकारी. गायत्री जोशी वगळता बाकी सर्वांचा अभिनय उत्तम झाला आहे. 

गाणी सगळी श्रवणीय असली तरी सावरियां हे कापायला हवं होतं.  पार्श्वसंगीत अगदी साजेसं आहे,  चित्रपटाच्या मुड नुसार मन काळवंडुन टाकतं आणि हलक्या सिन्सला फुलवतं. 

केवळ राजकारणी आणि इतरांना दोष देत बसुन न राहता केल्याने होत आहे चा संदेश देणारा हा सिनेमा संग्रही असावा असाच आहे.