Saturday 29 January 2011

दिल तो बच्चा है जी (२०११)

दिग्दर्शक - मधुर भांडारकर

वास्तववादी आणि सिरियस सिनेमा बनविणारा दिग्दर्शक ही प्रतिमा पुसण्यासाठी बहुदा मधुरने ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न 'दिल तो बच्चा है जी' सिनेमाद्वारे केला, बॉलीवूडपटांचा लाडका विषय 'प्रेम' घेऊन पण थोडासा वेगळा.. थोडा वास्तवदर्शी.  तरीही हा सिनेमा बिनसलेलाच आहे.

एक घटस्फोटीत चाळीशीचा आसपासचा (अजय देवगण), एक भोळा सरळमार्गी प्रेमावर गाढ विश्वास असणारा (ओमी वैद्य), तिसरा फ्लर्ट चालू टाईप (इम्रान हाशमी) , असे तीन वेगवेगळ्या लोकांच्या प्रेमाची ही कहाणी.  अजय देवगणचं त्याच्याच ऑफिसमधील नव्या इंटर्नवर प्रेम बसतं, ती त्याच्यापेक्षा वयाने तब्बल १७ वर्षाने लहान असते, ओमी वैद्यसारखा सरळमार्गी गृहीणी टाईप मुलगी स्वप्ननार्‍याला मुलगी आवडते ती RJ असते आणि अभिनेत्री व्हायचं स्वप्न बाळगून असते, तिच्या ठायी करीयर जास्त महत्वाचं.  प्लेबॉय इम्रान जिच्या प्रेमात पडतो तिच्या सावत्र आईसोबत त्याचं अफेअर असतं. अश्या अडचणी असणार्‍या प्रेमकथांचा पुढचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.

सिनेमाचा पिंड हलका फुलका ठेवायचा प्रयत्न आहे, पण विनोदी जागा अतिशय कमी आहेत, खळखळून हसण्याचे तर अतिशय कमी प्रसंग आहेत, बर्‍याच विनोदांना प्रेक्षक हसतही नाहीत.  आणि सर्व विनोद हे अश्लील आहेत (सिनेमाला A सर्टीफिकेट आहे).  थोडक्यात मधुरसाठी विनोदी सिनेमा हे प्रकरण बसलं नाही.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही नायिकेने अभिनयाचा प्रयत्नही केला नाही (अपवाद टिस्का चोप्रा) असं जाणवतं.  अजय देवगण काही सिन्स मध्ये उत्तम तर बाकी अवघडलेला वाटला.  ओमी वैद्य अजुनही थ्री इडिट्सच्या चतूर रामलिंगमच्या बाहेर आला नाही, त्यानं अजिबात व्हरायटी केली नाहीये, त्याला मराठी तेही पुण्याचं दाखवलंय आणि तो स्वतःच आडनाव 'केळकर' ऐवजी 'केलकर' असं हिंदी स्टाईल मध्ये म्हणतो, बाकी नॉन महाराष्ट्रीयन कॅरेक्टर्स असं म्हणतात ते समजू शकतं... तसंही अधुन मधुन त्याचं मराठीही तसं काही मराठीपण दर्शवत नाही.  इम्रान हाश्मीसाठी ही टेलरमेड भुमिका आहे, त्याला जास्त काही वेगळं करावं लागलं नाही, पण तिघातही सर्वात भाव तोच खाऊन जातो, आणि इमोशनल चेहराही त्याने बर्‍यापैकी दाखवला आहे.  'जन्नत' पासून त्याच्या दगडी चेहर्‍यात बरेच चांगले बदल झाले आहेत. :)

मधुर भांडारकर थोड्या सिन्समधुन चमक दाखवतो पण बाकी सिनेमा अतिशय सपाट वाटतो, तिनही पात्रांचे एकसारखे प्रसंग (उदा. प्रेम सफल होण्यासारखं वाटणे, नंतर तो भ्रम ठरणे) हे एकामागोमाग आहेत त्यामुळे पहिल्या पात्राचं जे काही झालं तेच दुसर्‍यांच होणार हे निश्चित असल्यामुळे बराच इंट्रेस्ट कमी होतो, हे दिग्दर्शकाचं अपयश झालंय.  थोडक्यात निराशाजनक अनुभव.

17 comments:

  1. Thanks for saving my money :P

    ReplyDelete
  2. धन्यवाद ......

    जास्त त्रास न घेता पाहयला मिळाला तर पाहीन नाहीतर :)

    ReplyDelete
  3. तेवढ Word verification काढा ब्लॉग वरच खुपच कष्ट पडतायेत कमेंट टाकायला त्यामुळे... :)

    ReplyDelete
  4. ब्लॉगवर स्वागत गौरव, आमचे गेले त्याचं काय हो ;)

    ReplyDelete
  5. सपा.. जिवाला लय त्रास घेऊ नको... सोडून दे वाईच! ;)

    ReplyDelete
  6. ते वर्ड व्हेरिफिकेशन काढलंय आता... :)

    ReplyDelete
  7. भेलकम बॅक पत्रे सरकार!!!
    आम्हास्नी फुकटात मिळाला तर पाहणार, हाय काय अन न्हाय काय!

    ReplyDelete
  8. ह्म्म्म... :( खूप गॆप घेऊन मधुरचा सिनेमा येत आहे म्हणून थोड्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता विभी सारखेच म्हणते...फुकटात मिळाला तरच पाहावा.

    ReplyDelete
  9. आनंदा आता माझेही विभीला अनूमोदन... चकटफू असला तर (आणि मुलं नसली आसपास तर, नाहितर अनेक शंकांना उत्तर देण्याचे दिव्य कर्तव्य पार पाडावे लागते )पाहीन म्हणते, कारण मधूर भांडारकरचा सिनेमा आणि अजय देवगण ह्या नावांमूळे जरा उत्सुकता वाटली होती...

    बाकि तुझ्याबाबत तर पत्रेसाहेब वेलकम बॅक :)

    ReplyDelete
  10. श्रीताई, होय मधुरचा सिनेमा म्हणून गेलं तर हाती विशेष काही आलं नाही..

    ReplyDelete
  11. सरकार, साहेब, राव असे विशेषण लाऊन जोडे मारा विभि....

    ReplyDelete
  12. लाडूताई :)
    भांडारकरांनी आणि देवगणांनी काहीच इम्प्रेस केलं नाही..

    ReplyDelete
  13. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 'पेज थ्री' वाला मधुर आणि अन्य चित्रपटवाला मधुर यांची तुलनाच नाही. त्याचा 'पेज थ्री', 'चांदनी बार' (आणि थोडाफार ट्राफिक सिग्नल) वगळता कुठलाच चित्रपट मला विशेष आवडला नव्हता. त्यामुळे आश्चर्य वाटलं नाही.. तसाही मी याच्या वाट्याला कितपत गेलो असतो याची शंकाच आहे आणि त्यात पुन्हा पत्रे सरकारांनी कन्फर्म केल्याने आता साफ काट मारतो !! :)

    ReplyDelete
  14. पेज थ्री आणि चांदनी बार हे त्याच्या सर्वोत्तम चित्रपटात येतात, तुझं मत पटलं.. मी सुद्धा विशेष अपेक्षेने गेलो नव्हतो :)

    ReplyDelete
  15. इतकाही टूकार नाही हा पिक्चर... सर्वसाधारण आहे. इम्रान हश्मीचं काम छान झालंय.. पण शेवट चांगला आहे... नेहमीसारखा पठडीमधला नाही. त्यामुळेच पिक्चर लक्षात राहतो. एकदा बघायला काही हरकत नाही.

    ReplyDelete
  16. चित्रपट हलकाफुलका म्हणजे एकदा पाहायला हरकत नाही पण त्यातली शाझान चित्रपटापेक्षा जास्त आवडली ... :)

    ReplyDelete
  17. आभार ओंकार.. टूकार वाटतो दिग्दर्शकाचं आधीचं काम पाहिल्यावर...

    धन्स देवेंद्रा...

    ReplyDelete