Friday, 23 April 2010

फुंक २ (२०१०)

दिग्दर्शक - मिलिंद गडागकर

परत एक राम गोपाल वर्माच्या कारखान्यातला सिनेमा, त्यात हॉरर थीम, अजुन एक भर म्हणजे सिक्वल.... पहावा का पाहू नये ? तसं पहायला गेलं तर नाविन्याची आशा फार कमी.
पण दिग्दर्शक तर नविन आहे ना? ट्राय करायला काय हरकत आहे? असेच अजुन काही प्रश्न मनात घेऊन आणि दुसरा कुठलाही चित्रपट पर्यायी नसल्यामुळे शेवटी फुंक २ पहायचं आम्ही ठरवलं.

जेव्हडं काही ऐकलं होतं त्यावरुन चित्रपटाकडुन खुप कमी आशा होत्या, आणि या अपेक्षेला चित्रपट जागला. कथा म्हणजे सरधोपट भयपटाची आहे, शहरापासुन दुर अश्या एकट्या बंगल्यात एक कुटुंब राहायला येतं, आणि मग भाग १ मध्ये मारलेल्या भुताने घेतलेला बदला.

स्पॉयलर अलर्ट..
भुत न दिसता दार अश्या पद्धतीने लावुन घेतं की कुणालाच ते उघडता येत नाही, पण सोफ्याआड लपलेले मनुष्य त्याला दिसत नाहीत. दोन मांत्रीकांना त्यांच्या घरात जाऊन मारणार्‍या भुताला एकाच बंगल्यातला लहान मुलांना मारता येत नाही, त्यासाठी २ तास खर्ची घालावे लागतात. भुत बदला घेताना नायकाला म्हणतं की मी तुझ्या आप्तांना तडपवुन मारणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांचा वॉचमन, कामवाली बाई, दोन मांत्रीक मारण्यासाठी २ तास खर्ची घालतो, आणि बळे बळेच शेवटाला दोघांचे प्राण घेतो, शेवटतर अतर्क्यच, बायकोला मारुन बाकी फॅमिलीला निवांत सोडुन देतो.

अश्या भरमसाठ चुकांमुळे पहिल्या ४०-४५ मिनिटांनंतर सिनेमाची पकड ढिली होते, सुरुवातीला खरोखरीच काही सिनमध्ये भिती वाटते, वातावरण निर्मीतीसाठी सर्वात मदतगार ठरले ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, बाकी सगळीकडे बोंबाबोंब. कॅमेरावर्क नेहमीप्रमाणे वर्मा स्टाईल, वेगळे काही नाही.

हॉलीवूडमध्ये भयपटांसाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना (उदा. पॅरानॉर्मल एक्टिवीटी), अलिकडच्या काळात भयपटांची सातत्याने निर्मीती करणारे राम गोपाल वर्मा रामसेपटांच्या वर्तुळाबाहेर येऊ इच्छीत नाहीत, ’भुत’ चित्रपटाचा अपवाद सोडता, बाकी सगळे भयपट एकाच माळेचे मणी वाटतात.

सिनेमा पाहीला असेल तर माझ्या मतांशी सहमत असणारच आणि पाहीला नसेल तर अर्धे पैसे मला दया... :)

Tuesday, 13 April 2010

स्वदेस, वुई द पिपल (२००४)

दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर

अरविंद पिल्ललमरी आणि रवी कुचिमंची या एनआरआय जोडगोळींच्या कार्यावर आधारीत २००४ सालचा आशुतोष गोवारीकरांचा ’स्वदेस’ माझ्या आवडत्या हिंदी चित्रपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे.  देशाबद्दलची थीम असुनदेखील बेगडी देशप्रेमाला दिलेला फाटा, आणि भारताच्या सद्यस्थितीचे उत्तम केलेले अवलोकन याच्या जमेच्या बाजु.  भारताने प्रगती जरी केलेली असेल तरी अजुनही ७०% ग्रामीण भारत अजुनही मागासलेला आहे.  शिक्षणसमस्या, वीजटंचाई, दारिद्र्य, बाल विवाह आणि सर्वात महत्वाची जाती व्यवस्था या सर्व समस्या, माणसांचे स्वभाव विशेष यासर्वांना हा चित्रपट स्पर्शतो.

कथा म्हणजे, अमेरीकेत नासा शास्त्रज्ञ असलेला मोहन भार्गव (शाहरुख खान) आपल्या लहानपणी सांभाळ केलेल्या कावेरीअम्मांना अमेरीकेत घेवुन जाण्यासाठी येतो, आणि भारतातिल खेड्यातल्या अनेक समस्यांसोबत त्याची ओळख होते.  अमेरीकेत राहील्यामुळे त्या बद्दल त्याला वाटणारे आश्चर्य, गावातील लोकांचे दुर्लक्ष, अनेकविध स्वभावाचे नमुने, प्रसंगी आलेली निराशा आणि काढलेला मार्ग यातुन सिनेमाची घडण होते.

सिनेमाचे एक-एक सिन्स वर्णन करण्याजोगे आहेत, सगळ्यात भावलेला प्रसंग म्हणजे, शेतकर्‍याच्या गावाहुन परत येणार्‍या मोहनची रेल्वे एका स्टेशनवर थांबते, त्या उन्हाच्या वेळी एक ८-९ वर्षाचे पोर २५ पैश्याला पाणी विकत असते, नेहमी बाटलीबंद (मिनरल वॉटर) पाणी पिणारा मोहन डबडबलेल्य डोळ्यांनी ते पाणी पितो. हा पाहण्यासारखा सिन आहे.  हरीदास या शेतकर्‍याची दैना ऐकुन अतिशय दु:खी झालेला मोहन शाहरुखने केवळ चेहर्‍याने दाखवलाय, एकही शब्द न बोलता.

केवळ व्यवसाय बदलला म्हणुन एका कुटुंबाला देशोधडीला लावण्यात येते,  घरात मुलांच्या अंगावर वितभर कपडे नसताना देखिल अतिथी देवो भव: म्हणुन पाहुण्यांना अन्न देणे तो गरीब कर्तव्य समजतो,  तर सरासर अन्याय असणार्‍या गोष्टींना समाज रीत समजतो.




दसर्‍याच्या दिवशी शाळेतल्या कार्यक्रमा दरम्यान अमेरिका कशी आहे याबद्दल गावकर्‍यांसोबत मोहनची चर्चा ’मेरा भारत महान’ वाल्यांनी ऐकायलाच हवी.  त्यातले मोहनचे ’जब भी हम मुकाबले में कम पडते है तो हम संस्कृती, परंपरा का आधार लेते है’ हे खासच.  मोहन निर्भयपणे म्हणतो ’मुझे नही लगता हमारा देश दुनियाका सबसे महान देश है, लेकीन ये जरुर मानता हुं के हममें वो काबिलियत है, अपने देश को महान बनाने की’...  बेगडी देशप्रेमापेक्षा हे झणझणीत अंजन खरंच उपयोगाचं आहे.

एकीकडे भारतातले सुशिक्षीत अमेरीकेत जाउन नासा सारख्या संस्थेमध्ये काम करत असताना गावात साधी वीज नसावी?  इंटरनेट, इमेल्स त्यांना परग्रहावरचे शब्द वाटावेत?
ब्राम्हण असणे म्हणजे केवळ पुजापाठ करावी?  खालच्या(?) जातींच्या लोकांना माणुस म्हणुन वागणुक नाही? ’संस्कृती’ बद्दल इतका अभिमान तरी वृद्धाश्रम भरलेले कसे?  मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता.. एक-न-एक अनेक समस्या आपल्याला अस्वस्थ करुन सोडतात.  या गोष्टी मोहन या अमेरिकेत राहणार्‍या माणसाला कळतात पण इथलेच लोक त्याबद्दल अतिव कोरडे असतात.

शास्त्रज्ञ असल्यामुळे शेवटचा वीज निर्मीतीचा प्रसंग केवळ हिरो असल्यामुळे सक्सेस झाल्याची भावना नाही येत. हे अजुन एक चित्रपटाचे यश.  एकदम शेवटची फिल्मी झालर सोडता संपुर्ण चित्रपट मला खुप भावतो.

३ तासांच्या या सिनेमात आशुतोष गोवारिकरने कमाल केली आहे, सिनेमा थोडाही कंटाळवाना होत नाही.  आशुतोषची प्रत्येक गोष्ट तपशिलवार दाखविण्याची सवय आहे, गावच्या इतिहासापासुन प्रत्येक समस्येच्या मुळाशी तपशिलवारपणे तो जातो.  शाहरुख नासाचा शास्त्रज्ञ असल्यमुळे खर्‍या नासामध्ये शुटींग केलेली आहे, आणि नासाच्या खर्‍याखुर्‍या प्रोजेक्टचे नाव सिनेमात वापरले आहे. शाहरुख खानच्या संयत अभिनयामागे आशुतोषचा खंबीर हात आहे. मी पाहीलेली शाहरुखची ही सर्वात उत्तम अदाकारी. गायत्री जोशी वगळता बाकी सर्वांचा अभिनय उत्तम झाला आहे. 

गाणी सगळी श्रवणीय असली तरी सावरियां हे कापायला हवं होतं.  पार्श्वसंगीत अगदी साजेसं आहे,  चित्रपटाच्या मुड नुसार मन काळवंडुन टाकतं आणि हलक्या सिन्सला फुलवतं. 

केवळ राजकारणी आणि इतरांना दोष देत बसुन न राहता केल्याने होत आहे चा संदेश देणारा हा सिनेमा संग्रही असावा असाच आहे.

Sunday, 11 April 2010

ट्रायांगल (२००९)

दिग्दर्शक - क्रिस्टोफर स्मिथ

कधी स्वत:चा सामना केला?  स्वत:ला समोर बघुन काय अवस्था होईल?  तुम्ही एका अनोळखी जागी जाता, पण आत कुठेतरी वाटतेय की आधी इथे भेट दिली आहे?  काही वेळापुर्वी घडलेले प्रसंग परत घडत आहेत?  आपल्या जीवनात असे काही विचित्र घडले तर आपली काय अवस्था होईल, ’ट्रायांगल’ हा सिनेमा अशीच एक गुंतागुंतीची कथा आहे...

जेस आपल्या आजारी मुलामुळे कायम दु:खी असते, ग्रेग तिचा मित्र तिला स्वत:च्या बोट वर समुद्र सफरीसाठी आमंत्रित करतो, जेणेकरुण एका दिवसाकरिता ती थोडी रिलॅक्स होऊ शकेल.  त्याच बोटीवर ग्रेगचे मित्र सॅली, डॉवनी, हिथर आणि त्याचा सहायक विक्टर सुध्दा सफरीला निघतात.

आरामात त्यांची सफर चालु असताना एकाएकी हवा स्थिर होते, त्यामुळे त्यांची बोट थांबते. अचानक दुरवर त्यांना घोंगावत येणारे वादळ दिसते, ग्रेग रेडीओ वरुन सागरी सहायक कक्षाला बोलतो पण वादळाचे कोणतेही निशान त्यांना त्यांची यंत्रे दाखवत नाहीत. काही क्षणातच त्या वादळाचा रोख त्यांच्याकडे वळतो त्याच्यापासुन वाचण्याचे त्यांचे प्रयत्न पुर्ण व्यर्थ जातात आणि सर्व पाण्यात पडुन बोट उलटते, काही क्षणातच वादळ निघुन जाउन स्वच्छ सुर्यप्रकाश पडतो, हिथर सोडुन सर्वांना ग्रेग पलटलेल्या बोटीवर ओढुन घेतो, हिथर मात्र कुठेच दिसत नाही.

हताश होऊन उपड्या बोटवर बसलेल्या सर्वांना आशेचा किरण म्हणुन एक महाकाय जहाज त्यांच्याकडे येताना दिसते, त्या जहाजावर ते चढतात.  आश्चर्यकारकरित्या त्या महाकाय जहाजावर कुणीच दिसत नाही, पण कुणीतरी मागावर आहे असा संशय जेसला नेहमी सतावत राहतो, ती जहाज आतुन पहाताना आधी ती इथे होती असे तिला नेहमी वाटत राहते.  अचानक त्यांच्यावर हल्ले व्हायला सुरुवात होते....

..... यापुढे पटकथेत काळाच्या मर्यादा तोडुन अनेक प्रसंग येतात आणि ते निस्तरता निस्तरता नायिकेबरोबर आपण सुध्दा थकुन जातो.  सिनेमा संपल्यावर सुध्दा आपल्याला ठळक कथा कळत नाही कोडे शोधण्याचा विचार सतत रहातो.  कधी कधी सगळं समजणे आवश्यक सुद्धा नसते ना? 

अत्यंत क्लिष्ट अशी कथा, पटकथा लिहिण्यासाठी आणि तितक्याच ताकदीने दिग्दर्शीत करण्यासाठी क्रिस्टोफर स्मिथचे अभिनंदन करायला हवे.  सिनेमाचा लुक चांगला आहे, प्रमुख जेसच्या भुमिकेत मेलिसा जॉर्ज या अभिनेत्रीने उत्तम कामगिरी केली आहे,  बाकी योग्य साथ देतात.  डोक्याला मनोरंजक खुराक द्यायचा असेल तर हा अनुभव घ्यायलाच हवा.

Saturday, 27 March 2010

फॉरेस्ट गम्प (१९९४)

दिग्दर्शक - रॉबर्ट झेमेकिस

बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेला फॉरेस्ट बाजुला बसलेल्या बाईला आपल्या जीवनाची कहानी सांगायला सुरुवात करतो, ऐकनारे बदलत जातात पण आपण मात्र फॉरेस्टच्या जीवनपटात गुंग होऊन जातो.  १९९४ साली आलेला आणि ऑस्कर पारितोषिके मिळवणारा ’फॉरेस्ट गम्प’ विल्सन ग्रुमच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे.



कमी आयक्यु असलेल्या फॉरेस्टला शाळेत प्रवेश नाकारला जातो, त्याच्या आईच्या प्रयत्नांमुळे तो शाळेत दाखल होतो, पण कमकुवत पायांमुळे पायांना ब्रेसेसचा आधार लावावा लागतो.  जेनी नावाची मुलगी सोडुन त्याचा कुणी मित्र नसतो.  असाच एकदा टारगट पोरं त्याच्या मागे लागतात आणि तो अडखळत पळायला सुरुवात करतो, आणि आश्चर्यकारकरित्या ब्रेसेस तोडुन तो उत्तम धावायला लागतो.  याच धावण्याच्या जोरावर कॉलेजमध्ये तो अमेरिकन फुटबॉलचा उत्तम खेळाडू होतो. 

पदवी मिळाल्यानंतर अमेरिकन आर्मीमध्ये दाखल होतो, विएतनाम मध्ये युद्धात सामिल होतो, तिथे त्याची मैत्री ’बब्बा’ नावाच्या अफ्रो-अमेरिकन तरुणासोबत होते. बब्बा आणि फॉरेस्ट त्यावेळी केवळ बब्बाच्या परंपरागत कोळी व्यवसायाबद्दल बोलणे होत असते आणि आर्मी मधुन निवृत्त झाल्यानंतर पार्टनर म्हणुन हा उद्योग करायचा असे ठरवितात. या युद्धात बब्बा मरण पावतो, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉरेस्ट अनेकांना वाचवतो, त्यात त्यांचा लेफ्टनंट डॅन सुद्दा असतो, डॅन दोन्ही पायांनी अधु होतो, आणि रणांगणावर विरमरण पत्करण्याएवजी अधु जीवन जगाव लागल्यामुळे फॉरेटवर नाराज होतो.  फॉरेस्टला ’मेडल ऑफ ऑनर’ मिळते.

आर्मीत असताना बंदुकिची गोळी लागल्यामुळे आराम करत असलेल्या फॉरेस्टला टेबल टेनिस (पिंग पॉंग) खेळण्याची सवय लागते आणि तो त्यात अत्यंत कुशल होतो, प्रसिद्ध होतो, यासाठी विशेष जाहिरात असलेली बॅट वापरण्यासाठी त्याला भरपुर पैसे मिळतात आणि तो बब्बाच्या घराकडे एक बोट विकत घेउन श्रिंपिंग व्यवसाय सुरु करतो, बब्बाची आठवण म्हणुन.  तिथेही मिळालेला पैसा तो बब्बाच्या घरी आवर्जुन देतो.

ह्या सर्व प्रवासात त्याची आणि जेनीची भेट होत असते,  पण जेनी कधीही त्याच्याकडे थांबत नाही आणि प्रत्येकवेळेस तिची जीवनशैली बदललेली असते, पण फॉरेस्टचे तिच्यावर प्रेम तसेच असते.
एकदा जेनी त्याच्या घरी असताना तो तिला लग्नाची मागनी घालतो पण जेनी नाही म्हणते, त्या रात्री त्यांचा शरीरसंबंध होतो पण दुसर्‍यादिवशी सकाळीच जेनी त्याला सोडुन निघुन जाते, या धक्क्यामुळे फॉरेस्ट धावायला सुरुवात करतो आणि सलग ३ वर्ष धावतो.

जेनीच्या पत्रामुळे तो तिला भेटण्यासाठी येतो, तिला आणि त्यांच्या मुलाला घेवुन घरी येतो, जेनी त्याला लग्नाबद्दल विचारते आणि हे पण सांगते की तिला न बरा होणारा आजार झाला आहे.   फॉरेस्ट तरीही तिच्यासोबत लग्न करतो....

फॉरेस्टच्या जीवनाच्या कथेमध्ये अमेरिकेतील मुख्य राजकिय आणि सामाजिक घडामोडींचा बॅकड्रॉप आहे,  अमेरिकेतल्या प्रत्येक राष्ट्रपती बरोबर तो भेटतो.  इतका असामान्य असुनही जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचे महत्व सिनेमात जागोजागी दिसते.  प्रमुख भुमिकेत टॉम हॅन्क्स ने लाजवाब अभिनय केला आहे,  त्याची संवाद म्हणण्याची असामान्य लकब, बोलका चेहरा आणि डोळे....  हा सिनेमा पहायलाच हवा!

Tuesday, 16 March 2010

द मंचुरियन कॅन्डिडेट (१९६२)

दिग्दर्शक - जॉन फ्रॅन्केहायमर

१९६२ सालचा कृष्णधवल सिनेमा ’द मंचुरियन कॅन्डिडेट’ नुकताच पहाण्यात आला.  फ्रॅन्क सिनाट्रा, लॉरेन्स हार्वी आणि ऍन्जेला लांसबरी यांच्या अदाकारीने सजलेला हा थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे.

कोरियन युद्धावरुन परतलेल्या सैनिकांमध्ये रेमंड शॉ याला मेडल ऑफ ऑनर देण्यात येते, त्याची शिफारस करणारे कॅ. मार्को यांना नेहमी एक विचित्र स्वप्न पडत असते, ज्यात त्याची आर्मीची टीम कॅम्युनिस्ट रशियन्स आणि कोरियन्स पुढे बसलेली आहे, आणि त्यांच्यावर हिप्नॉटीझम प्रयोग होत आहेत, आणि सार्जेंट रेमंड शॉ हा दोन साथीदारांची संमोहीत अवस्थेत हत्या करतो.  मार्को यांना यामुळे असे वाटते की कोरियन युध्दादरम्यान असे काही झाले आहे की रेमंड शॉ सारक्या नावडत्या माणसाला त्यांनी शिफारस केलेली चुकीची आहे.  नेहमी ह्या स्वप्नांमुळे हैराण झालेले मार्को मिलिटरी ऑफिसर्सची मदत घेउ इच्छीतात, पण केवळ एक स्वप्न म्हणुन त्याला दुर्लक्षीण्यात येते.  साधारण अश्याच स्वरुपाचे स्वप्न अजुन एका साथीदाराला पडल्यानंतर मात्र आर्मी मार्को यांच्या मदतीला तयार होते.

रेमंड शॉचे आपल्या आईबरोबरचे संबंध व्यवस्थित नसतात, त्याची आई मिसेस आईस्लिन हीचा आपल्या सिनेटर नवर्‍यावर पुर्ण पगडा असतो आणि त्याची राजकिय काराकिर्द ह्याच चालवत असतात.  आपल्या स्वार्थापायी आपल्या मुलाचा प्रेमभंग करायला देखिल मागे पुढे पाहत नाहीत आणि वेळ प्रसंगी फायद्याकरिता आपली भुमिकाही बदलतात.  रेमंडला सगळं कळुनही तो नेहमी त्यापुढे नतमस्तक होत असतो, याच कारण म्हणजे त्याच्यावर कोरियन युद्धादरम्यान संमोहनाचा प्रयोग झालेला असतो.

ह्या संमोहनाचा त्याच्यावर काय परिणाम असतो आणि या सगळ्याचा मार्कोच्या स्वप्नांशी काय संबंध असतो आणि सगळ्यांची उकल मार्को कसा करतो तो चित्रपटाचा उत्तरार्ध.  चित्रपट उत्तम आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत खिळवुन ठेवतो.

Monday, 15 February 2010

हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)

दिग्दर्शक - परेश मोकाशी.
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणा‌र्‍या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.

वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.
पण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).

मुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणा‍र्‍या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.

लंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.

फाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...

हा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्‍या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.

परेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...

Monday, 1 February 2010

रण(२०१०)

दिग्दर्शक - राम गोपाल वर्मा

’ब्रेकिंग न्युज’ आणि संसेशनल न्युज या आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहेत, प्रत्येक जण न्युज चॅनल्सना दोष देतो पण दिवस आणि रात्र तेच पहातो, आपण त्यांच्या इतक्या आहारी गेलो आहोत की त्यांच्या डोळ्यांनी आज आपण वास्तव पाहत आहोत, जे की वास्तवाचा केवळ आभास आहे, राजकारणी आणि पैसेवाल्या लोकांनी पत्रकारीता विकत घेवुन आपल्या डोळ्यांपुढे मायावी जाळे निर्माण करुन ठेवले आहे, मुळ झापडं बंद राहतील याची पुरेपुर काळजी घेतलेली आहे. याच ज्ञात(?) विषयावर रामगोपाल वर्मांचा ’रण’ आधारीत आहे.

विजय मलिक (अमिताभ बच्चन) इंडीया २४*७ या व्रुत्तवाहिनीचे मालक जे पत्रकारीता करताना मुल्य सांभाळुन, मसाला न घालता केवळ घडेल ते लोकांपुढे मांडत असणारे, व्रुत्त हे मनोरंजानेचे साधन मानणार्‍या लोकांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या वाहिनीची लोकप्रियता घसरु लागते.  नुसत्या बातम्या सांगन्यापेक्षा प्रेजेंटेशन महत्वाचे मानणार्‍या अमरिश (मोहनिश बहल) याची वाहिनी मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असते. 
त्यातच नविन मालिका काढण्याचे प्लॅन सुरु झाले की त्याच धर्तीवरचे कार्यक्रम आधीच अमरिशच्या वाहिनीवर रुजु होतात. 



विजय मलिकचा मुलगा जय (सुदीप) वाहिनीच्या रेटींग वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न करतो ते अमरिश हाणुन पाडतो.  जयला हाताशी धरुन जयचा भावोजी अश्वीन (रजत कपुर), आणि विरोधी पक्षनेता मोहन पांडे (परेश रावळ) या वाहिनीला हाताशी धरुन सत्ताधारी पक्षावर आतंकवादाचा खोटा आळ घालतात, आणि मोहन पांडे आपल्या मुख्यमंत्री पदाची वाट मोकळी करुन घेतो.  अश्वीन सुद्धा आपल्या पडीक प्रोजेक्ट्सला मंजुरी मिळेल म्हणुन यात सामिल असतो.  यानंतर हळुहळु विजय पेक्षा जय वाहिनीचा कारभार सांभाळु लागतो.  त्यांच्या वाहिनीवर मोहन पांडे बद्दल गुणगाण सुरु असते, नेमके हेच पुरब (रितेश) या नवपत्रकारला पचत नाही, ज्याचा विजय यांच्या सारख्या पत्रकारीतेवर विश्वास असतो.

याप्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे आणि ते शोधले पाहीजे म्हणुन तो सेल्फ रिसर्च सुरु करतो आणि मोहन पांडे, अश्विन, जय आणि अमरिश यांचा पर्दाफाश करतो.

तसं पाहायला गेलं तर कथेत काही नाविन्य नाही, पण मिडियाच्या काळ्याबाजुंवर आधी प्रकाश कुणी टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता.  राजकारणी मंडळी पत्रकारीतेला हाताशी धरुन न्युज तयार करतात आणि त्यांना पाहिजे तसे लोकांना नाचवतात.  या सर्वात आपण तद्दन मुर्ख ठरतो, हे कळुन आपल्याला वळत नाही, हीच शोकांतिका.

अमिताभने विजय मलिक अतिशय प्रभाविपणे साकारला आहे, शेवटच्या स्पिच आणि काही वेळा केवळ देहबोलीने तो असामान्य अभिनयाचे दर्शन देतो, त्याच्या व्यक्तीरेखेला मात्र सिनेमाच्या मध्याला कोपर्‍यात ढकललेले आहे.  परेश रावळ टिपिकल राजकारणी म्हणुन चोख भुमिका निभावतो.  रितेश आणि सुदिप यांनी कमाल केली आहे, दोघांनीही आपल्या भुमिकांना न्याय दिला आहे, रजत कपुर छोट्या भुमिकेत आहे, त्याला लिमिटेड स्कोप आहे.  मोहनिश बहल उत्तम.  गुल पनाग आणि नितु चंद्राला काही विशेष वाव नाही.  राजपाल यादव नेहेमीची ओवर ऍक्टींग करतो, पण आजकालचे न्युज रिडर तेच करत असल्यामुळे शोभुन दिसते... :)

रामगोपाल वर्माच्या सिनेमात नेहेमी असणारे वैशिष्ट्यपुर्ण कॅमेरा ऍंगल्स आणि ’गोविंदा’ टाईप पार्श्वसंगीत इथे सुद्धा आहे.  त्याची कॅमेरास्टाईल मला पर्सनली आवडत असली तरी कधी कधी ती अती टेक्निकल होते आणि पात्रांच्या चेहर्‍यावरच्या भावाकडे लक्ष न जाता आपण (मी ?) त्यातच भारावुन जातो, कधी कधी ते इरिटेटिंग सुद्धा होते, स्पेशली जेंव्हा हातांनी घेतलेल्या शॉट्स च्या वेळेस.  बाकी वेळेस मात्र खुप सही वाटते.  पार्श्वसंगीत बरेचदा भयानक सिनेमा प्रमाणे वाजते आणि संवाद एकण्यात व्यत्यय आणते.  बाकी तांत्रिक गोष्टी उत्तम आहेत.

शेवट परत थोडासा भरकटल्यासारखा... पण एकुण परिणाम ठीक.  मला आवडला, टिकाकारांसाठी ’कमेंट्स’ सेक्शन आहे ;-)